श्रीज्ञानेश्वरी आणि श्रीदासबोध ग्रंथातील गणेशस्तवनस्वाती हुद्दारवारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर यांची भगवद्गीतेवरील टीका म्हणजे ज्ञानेश्वरी आणि रामदासी संप्रदायाची स्थापना करणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी मानवी मनाला उपदेश करण्यासाठी लिहिलेला ग्रंथ म्हणजे दासबोध.ज्ञानेश्वरीची रचना झाली शके १२१२ म्हणजेच इ. स. १२९० आणि रामदासस्वामींनी दासबोधाची पहिली सहा दशके लिहिली शके १५८१ म्हणजेच इ.स. १६५९ साली. ज्ञानेश्वरीमध्ये एकूण १८ अध्याय आहेत आणि नऊ हजार तेहतीस ओव्या आहेत.दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत आणि एकूण ७,८०० ओव्या आहेत. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका सांगितली आणि सच्चिदानंदबाबांनी ती लिहून घेतली. दासबोधाचेही लिखाण समर्थांचे पट्टशिष्य कल्याणस्वामींनी केले आहे. ज्ञानेश्वरी नेवास्याला लिहिली गेली आणि दासबोध शिवथरघळीत लिहिला गेला. या दोन्ही ग्रंथांच्या निर्मिती काळामध्ये साधारण ३५०-४०० वर्षांचे अंतर आहे. ज्ञानेश्वर आणि समर्थ या दोघांच्या काळातली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत भिन्न होती. ज्ञानदेवांच्या काळात यादवांचे राज्य होते. समाज सुखवस्तू होता. आर्थिक संपन्नता होती.परिणामी भेदाभेद अमंगळ माजला होता. कर्मकांडाचे प्राबल्य वाढले होते. समाजातील जातिभेद, उच्च नीच भेद दूर सारून सामाजिक समरसता निर्माण करण्याचे मोठे आव्हान तत्कालिन संतांसमोर होते. त्यासाठी ज्ञानेश्वरांनी स्वतः नाथपंथी असताना सर्वसामान्यांसाठी सोप्या अशा भक्तिमार्गाचा पुरस्कार करीत भागवत धर्माच्या झेंड्याखाली अठरापगड समाज एकत्र आणत वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाला आराध्य मानत समतेची शिकवण जनामनात रुजवली आणि कर्मावर निष्ठा ठेवण्याची शिकवण देणारे गीतेचे तत्वज्ञान अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठीत सर्वसामान्यांना सांगितले. तेव्हा ज्ञानदेवांचे वय होते अवघे सोळा वर्षांचे. समर्थांच्या काळातली परिस्थिती अगदी भिन्न होती. सारा मुलूख यवनांच्या अंमलाखाली होता. सारीकडे मोगलाई माजली होती. कुलीन स्त्रिया बाटवल्या जात होत्या. लोक स्वाभिमान विसरले होते. मंदिरे तोडली जात होती. मुर्ती फोडल्या जात होत्या. शुरांनी आपले इमान परकीयांकडे गहाण टाकले होते. सारीकडे अंधकार भरून राहिला होता. अशावेळी समाजमनाला गरज होती रावणासारख्या दुष्टशक्तींवर विजय मिळविणाऱ्या रणकर्कश श्रीरामांची. म्हणून मनाच्या उत्कर्षाकरिता श्रीराम आणि शक्तीच्या उपासनेकरिता हनुमंताच्या उपासनेचा मार्ग समर्थांनी दाखवला आणि रामदासी संप्रदायाच्या माध्यमातून समाजमनाचा निद्रिस्त स्वाभीमान जागृत केला. जयजय रघुवीर समर्थ ही आरोळी दऱ्याखोऱ्यात घुमू लागली. वर्षानुवर्षांच्या पारतंत्र्याने पिचलेल्या मनांना उभारी मिळाली. सर्वसामान्यांना चांगले वाईट, योग्य-अयोग्य काय, याचा उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध लिहिला, तेव्हा त्यांचे वय होते ५१ वर्षांचे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे तर दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ आहे. ज्ञानदेव आणि समर्थ यांचे स्वभावधर्म वेगवेगळे होते. जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥१-५६॥ तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥ असे हळूवारपण ज्ञानदेवांच्या ठायी होते. त्यांचे कवित्व, त्यांचे माऊलीपण या ग्रंथात आपल्याला ठायीठायी भेटते. आधी प्रपंच करावा नेटका किंवा ठकासी व्हावे ठक असा उपदेश करणाऱ्या समर्थांची भाषा रोखठोक आहे. ज्ञानेश्वरी मराठीच्या सौदर्यस्थळांनी व्यापलेली आहे, दासबोधात मात्र कर्तव्य कठोरता दिसते. भाषेचे लाघव तिथे फारसे सापडत नाही. ज्ञानेश्वरी आणि दासबोध दोन्ही ग्रंथांचा आरंभ गणेशस्तवनाने झाला आहे. गणेशवंदन करताना ज्ञानदेव म्हणतात ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या जयजय स्वसंवेद्या, आदिरुपा ओमकार स्वरुप गणेशाला वंदन करून माऊली गणेशाच्या एकेका अवयवाचे ध्यान करतात. तेव्हा जणूकाही शब्द त्यांच्या समोर हात जोडून उभे असावेत, इतके लाघव त्या शब्दांमध्ये भरून राहिलेले भासते.इथे माऊलींनी वेद-उपनिषदांना गणेशरुप कल्पून वंदन केले आहे. म्हणजे शब्दरुप गणेशाची आराधना केली आहे. स्मृती हे श्रीगणेशाचे अवयव कल्पून अठरा पुराणे म्हणजे या गणेशाचे रत्नजडीत अलंकार आहेत आणि शब्दांच्या ताण्याबाण्याने गणपतीचे वस्त्र विणले गेले असल्याचे माऊली सांगतात. योगमार्गी ज्ञानदेवांनी निराकार गणेशतत्वाला शब्द म्हणजेच नादब्रह्म स्वरुपात साकार केले आहे, त्यातून अत्यंत लोभस, सुंदर अशी गणेशमुर्ती माऊली श्रोत्यांच्या डोळ्यासमोर साकार करतात. काव्यनाटक या कला म्हणजे गणपतीच्या पायातील नुपुरे आहेत, इतकी सुंदर कल्पना केवळ माऊलीच करू जाणोत कारण माऊलींमध्ये तत्ववेत्त्याइतकाच कवीही दडलेला आहे. पुढे गणेशस्वरुपाचे वर्णन करताना माऊली सांगतात व्यासांसारख्यांची बुद्धी म्हणजे गणेशाची मेखला आहे. एवढेच नव्हे तर सहा शास्त्रे म्हणजे गणेशाचे सहा हात आहेत. माऊलींची प्रतिभा पुढे तत्ववेत्त्याच्या भूमिकेत शिरते आणि माऊली गणेशरुपाच्या माध्यमातून सांख्ययोग, बौद्धमत, पातंजलदर्शन, पूर्वमिमांसा, उत्तरमिमांसा स्पष्ट करतात. तेव्हा माऊलींनी साकारलेल्या गणेशमुर्तीसोबतच आपण माऊलींच्या प्रतिभेसमोरही नतमस्तक होतो. ईशावास्य उपनिषद, श्रुतीस्मृती पुराण ही सारी गणेशाची अंगे आहेत, असे सांगताना माऊली श्रोत्यांना गणेश हेच ब्रह्मसुख म्हणजेच सोहम् असल्याच्या अनुभुतीपर्यंत आणून सोडतात. सारे विश्व व्यापून उरलेला ओमकार म्हणजेच गणेश असल्याचे सांगत अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।मकार महामंडल । मस्तकाकारें असे वर्णन माऊली करतात आणि अशा गणेशमुर्तीचे ध्यान केल्यानंतर साक्षात शब्दब्रह्म समोर उभे ठाकते.ही अनुभुतीही माऊली सांगतात.मोगऱ्याच्या फुलांनी ठायीठायी लगडलेली मोगऱ्याची वेल जशी मन मोहून घेते तशीच उपमा-उत्प्रेक्षांनी लगडलेले माऊलींचे हे गणेशस्तवन श्रोत्यांना खिळवून ठेवते. तुकोबारायांनीही त्यांच्या एका अभंगात गणेशाचे वर्णन ओमकारप्रधान असेच केले आहे. समर्थांनी दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या पहिल्या समासात श्रोत्यांशी संवाद साधत ग्रंथाचा उद्देश्य सांगितला असून या ग्रंथात कुठले विषय अंतर्भुत आहेत, ते सांगितले आहे. दुसऱ्या समासात त्यांनी गणेशाला वंदन करताना समर्थ म्हणतात, ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा समर्थही गणेशस्तवनाची सुरुवात ज्ञानदेवांप्रमाणे ॐ नमोजि या शब्दांनीच करतात. मात्र पुढे येणारे गणेशाचे वर्णन विघ्नहर्ता, इच्छित फळ देणारा, अज्ञानाचा नाश करणाऱ्या बुद्धीची देवता असलेल्या सगुण गणेशमुर्तीचे आहे. गणेशाच्या कृपेने सारी विघ्ने नष्ट होतात. गणेश म्हणजे भक्तांचे सर्व कोड पुरविणारे माहेर अहे, असेही समर्थ सांगतात. कार्यारंभी तुझे स्तवन केल्याने कार्य सिद्धीस जाते. अशी गणेशस्तुती केल्यानंतर समर्थ गणेशाच्या सगुण रुपाचे वर्णन करतात. पुराणामध्ये नृत्यगणेशाचे वर्णन अनेक ठिकाणी येते. समर्थही इथे गणेशाच्या नृत्यरुपाचे ध्यान करतात. नृत्यगणेशाचे भव्य-दिव्य रुप, शेंदूरचर्चित विस्तीर्ण भाल, रत्नजडित वस्त्त्रालंकार, कमरेभोवती गुंडाळलेला फणिंद्र, या साऱ्याचे वर्णन करतानाच नृत्य करताना गणेशाच्या पायातील घुंगुरवाळ्याचा लडिवाळ नाद, त्याच्या शुभ्र दंतपंक्ती, चतुर्भुजात धारण केलेले अस्त्र-शस्त्र, आणि गणेशाच्या नृत्याने देवसभेला शोभा आली असून गणेशाच्या दिव्य वस्त्राची आभा सारीकडे पसरली आहे. असे अत्यंत मोहक वर्णन समर्थांनी केले आहे. देवसभेत नृत्य करणारी गणेशमुर्ती डोळ्यासमोर उभी करण्याची ताकद समर्थांच्या शब्दात आहे. साऱ्या विद्यांचा आगर असलेल्या मनोरथ पूर्ण करणाऱ्या गणेशाला साष्टांग नमस्कार करून मी परमार्थाची अभिलाषा करतो, असे सांगत समर्थ त्यांचे गणेशस्तवन पूर्ण करतात. श्रीज्ञानेश्वरी आणि श्रीदासबोध दोन्ही ग्रंथांची सुरुवात गणेशस्तवनाने होत असली तरी माऊलींनी उभे केलेले गणेशरुप स्वसंवेद्य आहे. ओमकार रुप आहे. वेदांनीही 'नेति नेति' म्हणून ज्याचं वर्णन केलं असा निर्गुण निराकार गणेश आहे. तर समर्थांनी साकारलेले गणेशरुप सगुण आहे. तुमच्या माझ्या मनातले ते रुप आहे. घरोघरी म्हटली जाणारी गणपतीची सुखकर्ता दुखहर्ता ही आरतीही समर्थांचीच आहे. यातला गणेश म्हणजे सांसारिक भक्तांना संकटी पावणारा, निर्वाणी रक्षणारा आहे. गणपतीच्या या आरतीतही समर्थांनी तातातिडिकित तिडिकित नाचे गणपती असे नृत्यगणेशाचेच वर्णन केले आहे. एकूण या आरतीतही गणपतीचे सगुण रुपच समर्थांनी चर्चिले आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्येही गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा अशा शब्दात गणेशाची आराधना केली आहे. इथे मात्र समर्थ गणेशाला निर्गुण कल्पितात. ज्ञानेश्वरी आणि दासबोध दोन्ही ग्रंथातील गणेशवर्णन वाचल्यावर जाणवते की माऊलींचा गणेश शब्दलेणी लेऊन अवतरतो तो आदिरुप आहे आणि समर्थांचा गणेश भक्तप्रतिपालक आहे. ज्ञानेश्वरी आणि दासबोध दोन्ही ग्रंथातील गणेशरुपासमोर आणि ते साकारणाऱ्या प्रतिभावंत, तत्वज्ञ, अलौकिक संतांसमोर आपण नतमस्तकच होतो. |
||